Archive

Archive for एप्रिल, 2010

शिक्षण (?)

मी: काय मॅडम काय म्हणतय कॉलेज, नवीन विद्यार्थी?

मॅडमः अरे कोणी VLSI येणार असेल तर सांग, B.E. पाहीजे

मी: पण मागच्या वेळेस आपण भेटलो तेंव्हा तर तुम्ही वेगळाच विषयाला शिक्षक हवा म्हणून सांगितला होता

मॅडमः त्या विषयाला मिळाली एक मुलगी, आता VLSI ला असलेल्या मॅडमनी नुकताच राजीनामा दिला आहे, नवीन आलेले शिक्षक टिकतच नाहीयेत

मी: का?

मॅडमः ३ पॉलिटेक्नीक चालू झाले आहेत, आणखी ४ ला मंजूरी मिळाली आहे. त्यांनी पगार जास्त दिला की तिकडे जातात.

____________________________________________________________________________

घरी आलो तर माझा आत्तेभाउ आला होता. त्यान ह्या वर्षी एका नवीनच चालू झालेल्या पॉलिटेक्नीक मधे प्रवेश घेतला आहे.

भाउ: कधी आलास?

मी: काल रात्री. तुला कॉलेज नाही का?

भाऊ: अरे नाय, मास्तरन सोडून दिल.

मी: अरे हीरो तू इतके पैसे भरलेस तिथ जाण्यासाठी म्हणून, निदान त्याच्या माग लागायच ना शिकव म्हणून, पप्पांना कळल तर जोड्यान हाण्तील ना लेका.

भाऊ: अरे काय उपयोग नाय त्याचा , मास्तरांना काय येतच नाय. प्रॅक्टीकल करायला कॉलेजच्या लॅबमधे काही सामानच नाही, आमच्या मास्तरला आमच्या समोर उभ राहून धड बोलायला येत नाय मग काय करायच तिथ बसून, आलो निघून.

____________________________________________________________________________

नंतर रस्त्यात रव्या भेटला. ह्या महाशयांनी  ३ वर्षांच इंजिनीअरिंग ५ वर्षात आणि ३ वर्षांचा डिप्लोमा ४ वर्षात पूर्ण केला.

मी: काय रव्या कुठ आहेस लेका अजिबात दर्शन नाही.

रव्या: तुमचंच दर्शन नाही राव, तुमी आता मोठे लोक

मी: मग! काय चालू आहे सध्या?

रव्या: अरे तुला माहीत नाही? मी मास्तर झालोय

मी: कुठ?

रव्या: आपल्याच कॉलेजात

मी: काय सांगतोस, लै भारी काम झाल की राव.

रव्या: मग काय तर. अरे आत्ता २०,००० पगार देतात. आता सहावा वेतन आयोग लागू झाला की मग ३५,००० होइल, मस्तपैकी लग्न करायच. घराजवळ्च कॉलेज, २ तास शिकवायच आणि घरी यायच, टेंन्शन घ्यायच नाही.

मी: कोणाला शिकवतोस, डिग्रीला का डिप्लोमाला? रव्या: अरे त्यांनी डिग्री साठी घेतल आहे मला पण मला लै भीती वाटती यार त्या पोरांसमोर उभ राहायची , म्हणून मी डिप्लोमाच मागून घेतला.

____________________________________________________________________________

मागच्या वेळेस घरी गेलो होतो तेंव्हाचा हा किस्सा. सातारा शहराच्या आसपास आता या शैक्षणीक वर्षात एकूण ७ पॉलिटेक्नीक आणि आणि २ इंजिनीरींग महाविद्यालय असतील. ह्या वरच्या सगळ्या प्रकारानंतर मी माझ्या मित्रांबरोबर चर्चा केली तेंव्हा कळल की ही सगळी कॉलेजं (विद्यालय ?) बड्या बड्या पैसेवाल्या धेंडांची आहेत (हे वाक्य उगीचच टाकल अस वाटतय, कारण बड्या धंडांशिवाय दुसर्‍या कोणाला असल काही करताना कधी बघितलच नाही) आणि सगळीकडे गुणवत्तेच्या नावानी शिमगाच आहे. ही कथा एकट्या सातारा तालुक्याची आहे. अशीच परिस्थीती कराडला देखील आहे.

महाराष्ट्रात एकंदरीत ३५ जिल्हे आहेत, प्रत्येक जिल्ह्यात २ मोठी ठीकाण आणि प्रत्येक ठीकाणी सरासरी २ महाविद्यालय धरली तर १४० संख्या होते. इतक्या सगळ्या कॉलेजांत जाणार्‍या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी गुणवान शिक्षकच नाहीत. आणि हे सगळ फक्त अभियांत्रिकी शी संबधीत बोलत आहे, बाकिच्या क्षेत्रांविषयी कल्पना नसली तरी परिस्थीती फार वेगळी नसावी. ज्यांना शिक्षक म्हणून घेतल जात त्यांची स्वतःची परिस्थीती वरच्या रव्या पेक्षा वेगळी नाही. ह्या लोकांना फक्त पुस्तकी ज्ञान आहे इंडस्ट्रीचा अनुभव नाही अस म्हणायचीदेखील सोय नाही कारण पुस्तकी ज्ञानाचाही वरच्या उदाहरणाप्रमाणे आनंदच आहे.

पुणे – मुंबई अशा महानगरातील हाताच्या बोटावर मोजण्याएवढी कॉलेज सोडली तर सगळीकड परिस्थीती सारखीच आहे. ह्या महाविद्यालयातून दरवर्षी हजारो अभियंते बाहेर पडणार आहेत, पण बाहेर पडून नक्की काय करणार हा प्रश्नच आहे. जर शिक्षकांनाच काही येत नसेल, शिकवायच सोडून द्या, तर पोर काय शिकणार, घंटा ? बर हे सगळ कमी म्हणून की काय ह्या सगळ्या नवीन संस्थांची अशी जातीची समीकरण आहेत. ते आपल्या जातीच्या बाहेरच्या व्यक्तीला शिक्षक म्हणून घ्यायला तयार नाहीत, आणि ह्याच्यात सगळ्या जातीतले शिक्षण सम्राट असल्यान ह्या बाबतीत जाती – समानता आहे. बर ते किमान आपल्या जातीतल्या हुशार लोकांना घेतील तरी चालेल पण तसही नाही.

इलेक्ट्रॉनिक्स मधून डिग्री घेउन पास झालेल्या एका विद्यार्थ्याचा इंटर्व्यूला बिचार्‍याला ओहमचा नियम येत नव्हता (हे उदाहरण फार स्पेसिफीक आहे, पण ही अपेक्षा जास्त आहे का?). आता कोणी म्हणेल की मग बाकिच्या लोकांनी शिकूच नये का? अहो पण एखाद्या विषयाच शिक्षण म्हणजे फक्त त्याच्याशी संबंशीत सुरळ्या गोळा करण आहे का?

हे सगळ लिहीलय ते सातारच्या आसपास जे अभियांत्रीकी, वैदयकीय, व्यवस्थापन या प्रकारच्या कॉलेजांच जे वारेमाप पीक आलेल आहे त्यांच्याशी संबंधीत लोकांशी जी चर्चा होते त्याच्या आधारे. त्याला आत्ता माझ्याकडे आकडेवारीचा आधार नाही. ह्या असल्या व्यवस्थेतून शिक्षण घेउन बाहेर पडलेले लोक जेंव्हा शिकवायला येतील तेंव्हा काय होइल याची कल्पनाच करवत नाही, अर्थात त्याची बहुधा गरज पडणार नाही कारण ते काही काळात प्रत्यक्षच घडेल.

यावर उपाय काय? समस्या तर प्रचंड गंभीर आहे निश्चितच.

मला वाटत आपल्याकडे ३ उपाय आहेतः

१. राजकारणी-शिक्षणव्यवस्था यांच्या नावान खडे फोडण

२. काहीच न करणे (हा उपाय आहे?)

३. स्वतःच शिक्षण सम्राट बनण

४. आपल्याला जे शक्य आहे ते करण.

जे लोक शिकून बाहेर पडलेत आणि ज्यांच्यात बदल घडवायची, समाज वगैरे नाही तर आपापल कॉलेज फक्त, ताकत आहे अशा लोकांनी बदल घदवण्यात हातभार लावण. ज्यांना ज्यांना वाटत की हे हे बदल घडावेत त्यांनी त्यांनी, महीन्यातून एखादा दिवस फक्त जास्त नाही, जर आपापल्या शाळा कॉलेजांसाठी दिला तर आपण खरीखुरी अहिंसक क्रांती घडवू शकू.

कोणीतरी म्हटल आहे की ह्या जगातल्या सगळ्या वाईट गोष्टींना वाईट लोक नव्हे तर सद्गुणी पण निश्क्रिय लोक कारणीभूत आहेत. समाज बदलो न बदलो, आपण काहीतरी वाईट घडत असताना बघत न बसता ते थांबवायचा किमान प्रयत्न केल्याच समाधान तरी मिळेल.

काय म्हणता?

Categories: समाज Tags:
Follow

Get every new post delivered to your Inbox.