Deception: Pakistan, the U.S. and the Secret Trade in Nuclear Weapons – पुस्तक परीक्षण

ऍड्रीयन लॆव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क या दोन इंग्रज पत्रकारांनी लिहिलेल ही पुस्तक खूप पुराव्यांवर आधारित आहे. ए कयू खान या सर्वांना परिचित आणि भारतात कुप्रसिद्ध पाकिस्तानी शास्त्रज्ञापासून सुरू होणार हे पुस्तक पुढ पाकिस्तानी आण्विक कार्यक्रम कसं बाळस धरत गेला त्याला वेगवेगळ्या काळात वेगवेगळया पाकिस्तानी व्यक्तींनी कस पुढ नेल यांचा धांडोळा ही पुस्तक घेत. मुळात पाकिस्तानी कार्यक्रम सुरू झाला तो भारतान मे १९७४ मध्ये पहिला आण्विक स्फोट केला तेव्हा. झुल्फीकार अली भुट्टो यांनी पाकिस्तानी शास्त्रज्ञांना एकत्र बोलावून विचारल – तुम्ही मला अणूबॉम्ब देऊ शकता का. त्याला एका तरुण शास्त्रज्ञान – सुलतान बशीरउद्दीन महमुदन – होकारार्थी प्रतिसाद दिला. किती वेळ लागेल असं विचारल असता माहमुदन सांगितल की पाच वर्ष लागतील. त्यावर भुट्टोनि त्याला “मी तूला तीन वर्ष देतो – मला तीन वर्षात बॉम्ब दे” म्हणून सांगितल. इथून सुरू होतो तो पाकिस्तानचा अणुबॉम्ब बनवायचा थरारक प्रवास. पुढ त्यात यश मिळाल्यावर पाकिस्तान कडचा बॉम्ब हा आता केवळ भारतासाठीच नव्हे तर संबंध जगासाठी देखील धोकादायक ठरू शकतो.

२७ एप्रिल १९३६ ला भारतातील भोपाळमध्ये खान माता पित्याच्यापोटी जन्माला आलेल्या या सातव्या अपत्यान – अब्दुल कादीर खान यान संबंध जगासाठी डोकेदुखी निर्माण करून ठेवली. पाकिस्तानात खान यांना पाकिस्तानन त्यांच्या कर्तुत्वाबद्दल निशान-ए-इमतियाज आणि हिलाले इमतियाज असे दोन पुरस्कार दिले आहेत. ४ फेब्रुवारी २००४ रोजी थेट प्रसारित केलेल्या इंग्रजीत केलेल्या भाषणात त्यांनी स्वतः आण्विक शस्त्रा संबंधीच ज्ञान आणि सामग्री विकल्याच मान्य केल. ही कबुली आणि पश्चाताप खरे होते का? तर नाही. लोकनियुक्त सरकार बरखास्त करून सत्ता हस्तगत केलेल्या लष्करी अध्यक्ष परवेज मुशर्रफ (डॉ. खान यांच्या प्रमाणेच हेही मूहाजिरच) आणि खान यांच्यातील स्पर्धेत मुशर्रफन पाकिस्तानचा आण्विक प्रकल्प आणि स्वतःला वाचवायला खान यांचा बळी दिला होता.

स्टीव्ह कोलच्या “घोस्ट वॉर” पुस्तकात नोंद केल्याप्रमाणे १९७९ मध्ये अमेरिकेन अफगाणिस्तानात रशियाच कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नुकसान करायसाठी तिथल्या स्थानिक लढवय्याना – मुजाहिदना मदत करायच ठरवल. या कामी अमेरिकेन पाकिस्तानची मदत घेतली. त्यासाठी पाकिस्तानला शस्त्रास्त्रव्यतिरिक्त दहा वर्षात कमीत कमी ११ अब्ज डॉलर आणि सौदीन जवळ जवळ तेवढीच मदत केली. ही मदत प्रामुख्यान अफगाणिस्तानला जाण अपेक्षित होत. पण शस्त्रास्त्र आणि पैसे दोन्ही गोष्टी अफगाणिस्तानला किती गेल्या आणि मधल्या मध्ये पाकिस्तानन किती गायब केल्या याचा हिशोब ना अमेरिकेकड होता ना सौदी कड. यातला प्रचंड पैसा हा पाकिस्तानन त्यांच्या आण्विक बॉम्ब बनवायच्या कमी वापरला. मुशर्रफ प्रमाणेच लष्करी शासक असणाऱ्या जनरल झिया यांना हा “इस्लामिक बॉम्ब” बनवायचा होता. म्हणजे तो कोणत्याही इस्लामी राष्ट्राच्या रक्षणासाठी वापरता यावा असा. यातून पाकिस्तानन पाकिस्तानन हे तंत्रज्ञान इतर इस्लामिक राष्ट्रांना विकायचा प्रयत्न देखील केला. ज्यातुन एक मोठ गुंतागूंतीच जाळ विणल​. आणि जेव्हा हा व्यापार उघडकीस आला तेव्हा पाकिस्तानन खान यांचा बळी देऊन देशाचा आण्विक प्रकल्प सुरक्षित ठेवलाआणि काहीतरी थातुर मातुर कारवाई करून देशावर निर्बंध येऊ दिले नाहीत. ही निर्बंध घालायची अमेरिकेची तयारी होती का – तर नाही. अमेरिकेला देखील दिखाऊ कारवाई करायची होती. प्रत्यक्षात अफगाणिस्तानातील मोहिमेसाठी अमेरिकेला पाकिस्तानच्या नाक-दुरया काढण भाग होत.

दुसरी या पुस्तकात सविस्तर दिलेली माहिती म्हणजे अमेरिकेन गुप्तहेर संस्था सी आय ए आणि अमेरिकन सरकारचे इतर विभाग यांच्यातील वेगवेगळ्या उद्दिष्टामुळ सी आय ए न माहिती देऊन सुद्धा सरकारन ती माहिती त्यांच्या कॉँग्रेस (संसद) पासून दडवून ठेवली. इतकंच नव्हे तर दोन वेळा खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी शपथेवर तद्दन खोटी माहिती अमेरिकन कॉँग्रेसला दिली. त्या त्या वेळच्या राजकीय स्वार्थासाठी अमेरिकन अधिकारी आणि राजकारणी यांनी पाकिस्तानच्या या कार्यक्रमाकड डोळेझाक केली. एवढंच नव्हे तर रिचर्ड बारलो नावाच्या एक सी आय ए अधिकाऱ्यान जेव्हा पाकिस्तानी निवृत्त सेनाधिकाऱ्याला रांगेहाथ पकडायचा प्रयत्न केला त्यावेळेला अमेरिकन सरकारच्या स्टेट डिपार्टमेंट मधील अधिकाऱ्यानी पाकिस्तानला त्याची पूर्वसूचना दिली आणि संबंधित लोक कचाट्यात सापडले नाहीत. कहर म्हणजे ही सगळी माहिती आणि पुरावे एकत्रित करणाऱ्या बारलो या अधिकाऱ्यालाच कारस्थान करून दूर केल, त्याच वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त केलं. या राजकारणात अमेरिकेतील काही सरकारी लोकानी सर्व धरबंद सोडून अगदी जागतिक आण्विक ऊर्जा संस्थेचे (IAEA) प्रमुख मोहम्मद अल बारदेई यांचा फोन देखील टॅप केला.

एकंदरीतच झुल्फीकार अली भुट्टो पासून ते मुशर्रफ पर्यन्त पाकिस्तानच्या वेगवेगळ्या सत्ताधीशांनी – केवळ हिंदू भारताशी बरोबरी करण्याच्या वेडापायी आधी बॉम्ब तयार केला आणि एकदा तो तयार झाल्यावर तो विकून पैसे कमवायचे मार्ग शोधले. हे सगळ चालू असताना अमेरिकेन सत्ताधीशांनी त्यांच्या इतर उद्दिष्टांपायी याकड डोळेझाक केली आणि जगासाठी भस्मासुर निर्माण केला.

लेखक द्वयीची ही मुलाखत देखील जरूर पहा. 

https://www.c-span.org/video/standalone/?201509-3/pakistani-nuclear-weapons

Pakistan: A Hard Country – पुस्तक परीक्षण

आपल्या शेजारी असलेला आणि सतत आपल्या विनाशाची स्वप्न पहात त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानबद्दल मला कुतूहल आहे. हा देश नक्की कसा आहे, इथले लोक कसे आहेत, ते कसा विचार करतात आणि का?

भारतात आणि इतर जगात – पाकिस्तानची प्रतिमा ही साधारण Failed State – न चालणार राज्य किंवा अयशस्वी राज्य – अशी आहे. इथ व्यवस्था कोलमडली आहे किंवा कोलमडायला आली आहे अस वाटतं. सतत चालणारा गदारोळ, अतिरेकी हल्ले, पायदळाचे (आर्मी) देशात चालणारे उद्योग आणि राजकारणी, सैन्य आणि इस्लामिक कट्टर पंथिय गट यांच्यात सत्तेसाठी, वर्चस्वासाठी सुरू असलेली लठालठी, उपासमार, रोगराई वगैरे गोष्टींमुळ बाहेरील जगाला असं वाटण साहजिक आहे. भारतीय किंवा इतर माध्यमातून ज्या बातम्या समोर येत असतात त्यावरून हे चित्र निर्माण होत. पण माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते हा नियम लक्षात घेतला तर २२ कोटींचा देश या पलिकड देखील असेल ही लक्षात येत.

२०१० ला प्रकाशित झालेल्या या पुस्तकात ऍनातोल लिव्हेन नावाच्या एका माजी इंग्रज पत्रकारान हा देश विशद करायचा प्रयत्न आहे. पुस्तकाच्या सुरवातीलाच लेखकान पाकिस्तानच्या जगात असणाऱ्या प्रतिमेचा उल्लेख करून – त्यातील बरचस जरी खरं असलं तरी त्याचबरोबर हा देश अगदी उद्या कोसळून इथ यादवी माजेल ही शक्यता खूप कमी आहे असदेखील म्हटल आहे. लेखकाच्या मते ज्या गोष्टींमुळ या देशाची प्रगती झाली नाही त्याच गोष्टी या देशाला एकत्र ठेवतात. आणि हा देश जर खरंच कोसळून पडायचा असेल, तर एकतर अमेरिका किंवा भारत किंवा दोन्ही देशांनी एकत्र येऊन जर केल तर किंवा त्यापेक्षा जास्त शक्यता म्हणजे बिघडत जाणाऱ्या नैसर्गिक परिस्थितिमूळ. लेखकान भारतीय उपखंडातील मुस्लिम समुदायाचा इतिहास, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी वगैरे गोष्टी विचारार्थ घेतल्या आहेत. मोहम्मद आली जिन्ना यांनी सुरवातीला भाषण करताना निधर्मी देश असेल म्हणून सांगितल असल तरी तोच देश पुढ “इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान” कसा झाला यांचाही धांडोळा पुस्तकात घेतला आहे.

मुख्य गाभा जर बघायचा झाला तर साधारणपणे या देशात सरकार नावाची व्यवस्था आहे आणि ही व्यवस्था जरी सर्व शक्तिमान भासत असली तरी प्रत्यक्ष सत्ता मात्र अनेक लहान गट – ज्यांचा आधार घराण हा आहे त्यांच्यात विभागली आहे. सैन्य वगळता इतर कुठलीही व्यवस्था या घराणेशाहीच्या व्यवस्थेला धक्का लावू शकत नाही. आणि सैन्य देखील अधिकृतरित्या सत्तेत असताना त्यांना देखील या अनेक लहान मोठ्या घराण्यांशी जुळवून घेतच गाडा हाकावा लागतो. देशाच्या प्रत्येक भागात वेगवगळी असंख्य सत्ताकेंद्र आहेत. त्यामुळ कुठलाही निर्णय घेण अवघड आहे, तो अमलात आणण त्याहून अवघड आहे. यामुळ देशाची प्रगती होत नाही. पण दुसऱ्या बाजूला हेच लोक स्वतःच्या स्थानिक प्रथा आणि परंपरा आणि मुख्य म्हणजे स्वतःची सत्ता अबाधित ठेवण्यासाठी एकवाक्यता असणाऱ्या कट्टर धार्मिक व्यवस्थेला शरण जाऊ शकणार नाहीत. शरियाचा एकच एक विशिष्ट अर्थ लावणारा एकछत्री अंमल अवघड आहे. पाकिस्तानी जनता जरी अफगाणिस्तानात आणि इतरत्र शरिया हवा म्हणून म्हणत असली तरी तो शरिया त्यांना त्यांच्या आयुष्यात एका मर्यादे पलिकड नको आहे.

लेखकान अनेक ठिकाणच्या सूफी प्रथा उल्लेखल्या आहेत आणि त्या प्रथा इस्लाममधीलच एक भाग म्हणून वर्णन केला आहे. पण मी इतरत्र पाहिलेली सूफी “संतांची” क्रूरता पाहता ते सर्वसमावेशक आहेत हे पटण अवघड आहे. दुसरं म्हणजे त्या प्रथा या मूळच्या हिंदू स्थानांच्या असाव्यात असंही वाटत. पण पुस्तकात यांच्या पलिकड मुख्य चार गट – पंजाबी, पशतून, सिंधी आणि बलोच त्यांच्यातील वेगवेगळे गट आणि साधनांसाठी चाललेली चढाओढ संख्या बळान जास्त असणाऱ्या पंजाबी लोकांचा वरचष्मा – अल्पसंख्य पण शिक्षित असणाऱ्या मूहाजिर लोकांचा लढा असे अनेक विषय समाविष्ट केले आहेत.

पुस्तक वाचत असताना अनेक ठिकाणी लेखकान पाकिस्तानची भारताशी तुलना केली आहे ती अनाठायी वाटते. पण लेखकान वापरलेला Negotiated Democracy हा शब्दप्रयोग मात्र खास आवडला. हा शब्दप्रयोग केवळ पाकिस्तानच नव्हे तर इतर अनेक ठिकाणी व्यक्ति आणि व्यवस्था यातील संबंध पाहण्यासाठी एक मापदंड म्हणून वापरता येईल. पुस्तकात अल्पसंख्यांक आणि त्यांच्या संमस्यां विषयी फार उल्लेख नाही. खासकरून धर्म परिवर्तनात सहभागी असणारे मुल्ला आणि ईशनिंदा (blasphemy) यावर फार काही नाही.

खाली लेखकाची सविस्तर मुलाखत आहे. 

स्टीव्ह कोलच – घोस्ट वॉर – पुस्तक परीक्षण

अफगाणिस्तानच्या साम्यवादी सरकारला मदत करायला २४ डिसेंबर १९७९ रोजी ३०,०००० ची रशियन सेना (रेड आर्मी) आमू दर्या नदी पार करून अफगाणिस्तानात आली. साम्यवादी सरकार टिकवायच असेल तर एवढा एकच मार्ग उपलब्ध होता. अफगाणिस्तानात इस्लामिक – धार्मिक सत्ता स्थापित करू इच्छिणारे गट आणि नास्तिक साम्यवादी गट यांच्यातील सत्ता संघर्षाचा हा परिपाक होता.

त्याच डिसेंबर महिन्याच्या सुरवातीला सौदी अरेबियातिल मुस्लिम धर्मियांसाठी सर्वात पवित्र असणाऱ्या मककेतील मशिदीवर काही विभाजनवादी गटांनी ताबा मिळवला होता. या विभाजनवादी गटांना सौदीतील राजघराण उलथून टाकून तिथ एक कट्टर इस्लामिक सत्ता स्थापन करायची होती. ते बंड जरी मोडून काढल असल तरी कट्टर इस्लामिक गटांची भिती राजघराण्याला वाटत होती.

१९७१ मध्ये भारताबरोबरच युद्ध हरून अर्धा देश गमावलेल्या पाकिस्तानला अफगाणिस्तानात वरचष्मा स्थापन करायचा होता.

अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात जागतिक सत्ता स्पर्धा चालू होती. त्यातून जिथ आणि जस शक्य होईल तस एकमेकांना शह देणे चालू होत. यातूनच अगदी कमी खर्चात अफगाणिस्तानात रशियाला त्रास देता येईल अशी कल्पना काही अमेरिकन सनदी आणि गुप्तहेर अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून निघाली.

मग अमेरिकेन रशियन सैन्या विरुद्ध लढणाऱ्या अफगाण मुजाहिदीन गटांना हळू हळू मदत करायला सुरवात केली. सुरवातीला रेगन सरकारन केवळ प्राथमिक स्वरूपाची मदत केली. ही मदत अमेरिकेन थेट न करता कुप्रसिद्ध पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आय एस आय ची मदत घेतली.

त्याचवेळेला अफगाणिस्तानात बस्तान बसवू पाहणाऱ्या नास्तिक रशियन लोकांचा डोळा इराणच्या आखातातील तेलावर आहे अशी भिती सौदी राज घराण्याला होतीच. त्यांनीही आय एस आय मार्फत या मुजाहिदीनांना आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत करायला सुरवात केली.

घोस्ट वॉर या पुस्तकात इथून सुरू होणार घटनाक्रम पुढ अमेरिकेवर झालेल्या ११ सप्टेंबरच्या हल्ल्याच्या आधी एक दिवस म्हणजे १० सप्टेंबर २०११ पर्यन्त येऊन थांबतो. स्टीव्ह कोल या लेखकाच हे पुस्तक सर्व सामान्यांना अमेरिकन यंत्रणा, त्या यंत्रणांचे एकमेकांतील हेवेदावे आणि अविश्वास, लोकशाहीतील निर्णय प्रक्रिया या गोष्टींची सविस्तर ओळख करून देत. त्याचबरोबर कुठलाही देश त्यांच्या स्वतःच्या नागरिकांसाठी इतर नागरिकांचा आणि अगदी देशांचा देखील किती सहज बळी देऊ शकतो याचदेखील उदाहरण आपल्याला बघायला मिळत.

या पुस्तकात जे मुख्य कलाकार आहेत ते म्हणजे वर वर्णन केलेले देश – अमेरिका, रशिया, पाकिस्तान आणि सौदी अरेबिया. स्टीव्हन हे पुस्तक लिहिताना अनेक उघड केलेले सरकारी कागद अनाई मुलाखती यांचा आधार घेतला आहे. तसंच ताज्या आवृत्तीत नंतर बाहेर आलेल्या माहितीचा पण समावेश केला आहे.

गुप्तहेर, गुप्तचर संस्था आणि त्यांचे उद्योग 

साधारण बावीस वर्षांच्या या कालावधीत सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली ती तिन्ही गुप्तहेर संस्थांनी. त्यांच्या आतील कामाच स्वरूप आपल्याला कळत, तसच यात सामील समाजांच्या वेगवेगळ्या धारणा आणि त्यानुसार बदलणाऱ्या भूमिका ह्या या सगळ्यात महत्वाच्या ठरतात. अमेरिकन सी आय ए ही शेवटी एका लोकशाही देशातील एक सरकारी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेला किती स्वतंत्र निर्णय घेता येऊ शकतात यात लोकशाहीतिल कच्चे दुवे कळतात पण भक्कम व्यवस्थेचे पुरावे मिळतात. त्याचवेळेला भारत द्वेषान ग्रस्त असलेल्या पाकिस्तान मधील कुडमुडी लोकशाही कशी त्यांच्या आय एस आय वर नियंत्रण ठेवायला अयशस्वी ठरते आणि कालांतरान सौदी आणि अमेरिकन पैशान तीच संस्था कशी त्या देशातील सर्व शक्तिमान संस्था बनते तेही आपल्याला दिसतं.

हे सगळ बघताना एक व्यवसाय म्हणून हेरगिरी हे noble profession असण कस अशक्य आहे हेही सर्व सामान्य माणसाला जाणवत. अमेरिकन गुप्तहेर संस्थेन रशियन सैनिक मारण्यासाठी दिलेल बक्षीस असो वा मुजाहिदीन लोकाना देण्यासाठी दिलेल सामान आणि पैसे चोरणारी आय एस आय असो.

अफगाणिस्तान 

 हे सगळ जिथ घडलं त्या अफगाण समाजाविषयी देखील काही गोष्टी समोर येतात. उदाहरणार्थ रशियन सैन्याशी लढणारे मुजाहिदीन अफगाण असले तरी ते कधीही आत्मघातकी हल्ल्याला तयार झाले नाहीत. आत्मघातकी हल्ल्यासाठी जे तयार झाले ते जिहादसाठी आलेले प्रामुख्यान अरब आणि इतर लोक होत. अफगाण समाजातील जाती जातींमधील न सांधली जाणारी दरी बघता नजीकच्या काळात तरी तो एक देश म्हणून त्याच काही होण अवघड आहे असं वाटत. तिथले वेगवेगळे वांशिक गट – ताजिक, उझबेक, हाजरा हे अल्पसंख्य गट आणि पशतून बहुसंख्य गट हे सगळे एकमेकाला पाण्यात पाहतात. त्यात पुन्हा शिया आणि सुन्नी वाद. यात भर म्हणून अफगाण सीमेला लागून असलेल्या भागात – डयूराण्ड रेषेजवळ पाकिस्तानात आय एस आय च्या आशीर्वादान उभारलेले आणि चालू असलेले मदरसे. या मदरशातून सतत बाहेर पडणारे – कुराणाचा एक हजार वर्षांपूर्वीचा अर्थ लावणारे आणि त्यानुसार समाज घडवण्याची मनीषा बाळगणारे जगभरातून आलेले प्रामुख्यान सुन्नी मुस्लिम तरुण. सर्वसामान्य अफगाण लोकाना बाहेरच्या सर्वच लोकांविषयी तिटकारा आहे, मग ते नास्तिक रशियन असो, ख्रिश्चन अमेरिकन असो की कट्टर मुस्लिम अरब असो. त्यामुळ हा देश इतका गुंतागुंतीचा आहे.

अहमदशाह मसुद 

या सगळ्या अखंड हिंसाचारात लेखकाला अहमदशाह मसुद विषयी असलेला सॉफ्ट कॉर्नर स्पष्ट दिसतो. अर्थात अहमद शाह मसुद म्हणजे पंजशीरचा वाघ, हा माणूस होताही तसाच. अफगाणिस्तानात जी काही शांतीची थोडीफार आशा होती ती जर तो यशस्वी झाला असतं तरच होती. पण अकरा सप्टेंबर च्या आधी दोन दिवस एका स्फोटात त्याला मारण्यात आल आणि अफगाणिस्तानच मोठ नुकसान झाल. याचा अर्थ अहमदशाह मसूद अगदी देव होता अस नाही. त्यान काबूलमध्ये हिकमतयारशी लढताना खूप हिंसाचार केला होताच. पण जिथ रोजच युद्ध चालू होत तिथ दगडापेक्षा वीट मऊ हाच न्याय.

या अहमदशाह मसूदला भारतान मदत केली होती आणि त्याच्यावर शेवटचा जीवघेणा हल्ला झाला तेव्हाही त्याला भारतानं उभारलेल्या रुग्णालयात नेण्यात आल. हा सुशिक्षित, दारी आणि फ्रेंच या भाषा सफाईन बोलणारा, फारसी कवितांचा चाहता, तुलनेन आधुनिक दृष्टिकोण असणारा अहमद अफगाणिस्तानसाठीची आधुनिक स्वप्न असणारा होता. त्याच्या एका स्मृतिदिनाला नितीन गोखले यांनी घेतलेली एका माजी भारतीय सैन्याधिकारी जनरल साहनी यांची ही मुलाखत आहे.

आज पुस्तकाच महत्व

एकोणिसशे एकोणनव्वद साली रशियान आपल सैन्य अफगाणिस्तानातून काढून घेतल. तोपर्यंतच्या दहा वर्षात अमेरिकेन तिथ दहशतवाद मोठ्या प्रमाणावर पोसला होता. एकोणनव्वदला रशिया बाहेर पडल्यावर अमेरिकेचा तिथला रस संपल्यावर तिथ पोकळी निर्माण झाली आणि त्यातून लादेन सारखा भस्मासुर झाला. ज्याचा अमेरिकेला फटका बसला. पण त्याच पोकळीत आणि पाकिस्तानच्या आशीर्वादान त्यांच्या सीमेत जे काही झाल त्याची फळ जगाला भोगायला लागली आणि आजही लागताहेत. आज बरोबर २१ वर्षांनी वर्तमान अमेरिकन अध्यक्ष बायडेन यांनी ११ सप्टेंबर २०२१ ला अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान सोडेल आस जाहीर केल आहे. म्हणजे ही पुन्हा एकदा एका महासत्तेची हार आहे. तालिबान, अल कायदा आणि यांना अप्रत्यक्ष समर्थन देणाऱ्या आय एस आय चा हा विजय आहे.

आज जे काही होत आहे ते पुन्हा तेच होतंय. भारतासाठी डोकेदुखी मोठ्या प्रमाणावर वाढेल कारण पाकिस्तानला मोकळा श्वास घ्यायला जागा मिळेल. जागतिक इस्लामिक धर्मांध लोकांसाठी अफगाणिस्तान हा पुन्हा एकदा एक सुरक्षित भाग बनेल, ज्यातून हा भस्मासुर पुनरुज्जीवित होऊन जगाला त्रास देऊ शकतो.

या सगळ्यात रस असलेल्या लोकानी ही पुस्तक नक्की वाचाव.

थकलेला देश

The life and times of Saataarkar – 1

गेल्या वर्षी, म्हणजे २०२० मध्ये, २० मार्चला पंतप्रधान मोदीनि जनता कर्फ्यूची घोषणा केली. बहुतेक लोक मोठ्या उत्साहान त्यात सामील झाले. त्यावेळेला सबंध भारतात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या चिनी व्हायरसच्या केसेस होत्या. मला संचारबंदी आणि जमावबंदी माहीत होती, लॉकडाऊन प्रकार नवीन होता. पण एकंदरीत घरात बसून राहायच होत. पुढ पंतप्रधानांनी २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर केल. मग मात्र अचानक हृदय बंद पडाव तस सगळ थंड झाल. कधीही न दिसलेली दृश्य दिसू लागली – पूर्ण मोकळ्या रस्त्यांची.

मध्यम वर्गीय जमातीच बहुतेक काम नेटवरून चालू असल्यामुळ फरक पडला नाही. पोर घरात खेळू लागली. खूप गंमत वाटली. शाळा बंद झाल्या. बळच घरात बसून राहायच तेही महिना भर – कुटुंबाबरोबर अचानक संवाद वाढला. वेळ कसा घालवायचा ही समस्या होती. रोज तास – दोन तास प्रवासातच जायचे ते अचानक बंद झाले. अनेक कुटुंबच्या कुटुंब एकमेकांशी whatsapp वर बोलू लागली. एखाद्या व्यक्तीला चिनी व्हायरसची बाधा होणे म्हणजे भयंकर गोष्ट होती.

रोज कुठ किती केसेस सापडल्या त्याच्या बातम्या येऊ लागल्या. पण एकंदरीत वातावरणात सुट्टीची भावना होती, भिती अजिबातच नव्हती. पुढ हे लॉकडाऊन थोड शिथिल केल आणि दुकान काही काळ उघडायला सरकारन परवानगी दिली. त्याबरोबर खरेदी अचानक वाढली. हॉटेल आणि इतर सर्व प्रकारची खरेदी बंद झाल्यामुळ लोकांनी संधि मिळताच प्रचंड खरेदी केली आणि साथ पसरू नये म्हणून देश बंद केला आहे की लोकांना सक्तीची सुट्टी मिळावी म्हणून हेच कळायच बंद झाल.

याचबरोबर प्रचंड पीक आल ते म्हणजे तज्ञांच. पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात त्यापेक्षा प्रचंड प्रमाणात हे तज्ञ उगवले. हे तज्ञ आता पुढच्या आठवड्यात लोक रस्त्यावर पटापटा माशा मारतात तशी मरू लागतील अशी भाकीत करू लागले. दुसऱ्या बाजूला विशेष काही होणार नाही आम्ही यातून सहज तरुन जाऊ अस म्हणणारेही होते. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट सुरू झाली ती म्हणजे सोशल मिडियावर माहितीचा आणि अफवांचा भडिमार. काय केल्यान कोरोना होणार नाही याचे इतके उपाय आले की विचारता सोय नाही. आणि त्याचबरोबर असंख्य चांगले वाईट विनोद.

मग सुरू झाल ते स्थलांतर – देशात कुठल्या राज्यात कुठल्या राज्यातील कामगार काम करताहेत ते अचानक समोर आल. वाढत्या सुबत्तेबरोबर तुलनेन सधन राज्यात तुलनेन मागास राज्यातील असंख्य लोक काम करत होते. त्यांच उत्पन्न जस बंद झाल तस त्यांनी घरचा रस्ता धरला. त्यांच्या करून कहाण्या समोर येऊ लागल्या. अनेक लोक कायमचे गेले तर बरेचसे परत कधी येऊ हे माहीत नसल्यान पुढच पुढ बघू अस म्हणून बाड बिस्तरा घेऊन निघाले.

साथ हळू हळू पसरत होती. पण जेवढे मृत्यू अपेक्षित होते – किंवा कदाचित काही लोकांना हवे होते म्हणता येईल – तेवढे काही भारतात झाले नाहीत. अस नक्की का झाल हे कुणीच समाधानकारकपणे सांगू शकलेल नाही. लॉकडाऊन मूळ झाल का? असेलही. आत्ता निश्चित माहीत नाही एवढ खर.

लाखो करोडो मृत्यू न होता भारतान यावर कशी काय मात केली याच आश्चर्य काही लोकान वाटल तर पाश्चिमात्य प्रसार माध्यमांना दुःख झाल अस वाटत होत. त्याच वेळेला युरोप आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत होते आणि त्यांच्या तश्या बातम्या येत होत्या.

पुढ बंधितांची संख्या कमी होऊ लागली काही ठिकाणी तर ती शून्य देखील झाली. हळू हळू हे कोरोना काही विशेष नाही आणि उगाच बागुलबुवा केला आहे अस वाटू लागल. अमिताभ बच्चन फोनच्या कॉलर ट्यून च्या माध्यमातून दिवस रात्र “सुरक्षित अंतर ठेवा, मास्क घाला, सतत हात धुवा” वगैरे सांगत होताच. हॉटेल, सिनेमागृह वगैरे हळू हळू चालू होऊ लागले. लग्नाला २५ च्या ऐवजी ७५ माणसांची अनुमति मिळू लागली. सगळ पूर्व पदावर येतय अस वाटू लागल.

या सगळ्या काळात शाळा बंदच होत्या. सुरवातीला शाळा ठारच बंद झाल्या. मग हळू हळू WhatsApp वर सुरू झाल्या. पुढ ज्यांना शक्य होत त्या शाळांनी पूर्ण ऑनलाइन चालू केल्या. त्यावर नंतर कधीतरी.

फेब्रुवारी २०२१ च्या मध्यावर पुन्हा एकदा केसेस डोक वर काढू लागल्या. यावेळेस साथ पसरण्याचा वेग जास्त होता आणि बघता बघता आजू बाजूचे लोक आजारी पडू लागले. सुरवातीला वय झालेले लोक मृत्युमुखी पडू लागले. मग अगदी तरुण असलेले म्हणजे तिशीतले लोक देखील बळी पडू लागले. मृत्यूच खऱ्या अर्थान तांडव सुरू झाल. रोज कुणी न कुणी जवळच गेल्याच कालू लागल. त्यात महाराष्ट्रात सरकारन परत एकदा लॉकडाऊन जाहीर केल – बाजार थंडावले. सतत त्याच चर्चा, तेच आकडे उपाय कुणालाच दिसत नाही.

यावर लस आली आणि त्याचबरोबर त्याच राजकारणही. पण १३० कोटी लोकांना ती लस देण म्हणजे मेरू पर्वत उचळण्याचाच उद्योग तो. मग तोपर्यंत काय? विचार कर करून थकवा येऊ लागला. आता नातेवाईक देखील एकमेकांशी बोलून कंटाळले होते. कुणी आजारी पडल तर एकट्या कुटुंबालाच सगळ करांव लागत होत. मदत करायची इच्छा असूनही अगदी शेजारी पाजारी देखील करू शकत नव्हते. हळू हळू हतबलता आणि निराशेन मनाचा ताबा घेतला.

समोर सतत मृत्यू आणि चर्चा देखील केवळ मृत्यूची. मृत्यूच तांडव. तांडव हा शब्द फार सहजपणे वापरला जातो. पण जेव्हा अन्त्य संस्कार करायला स्मशानं अपुरी पडू लागतात तेव्हा त्या शब्दाचा अर्थ थोडा फार कळला अस वाटत. यातच माणसाच्या रूपातील दानव आणि देव दोन्ही दिसू लागले. ते नसतात अस नाही, पण परिस्थिती माणसातील मूळ प्रवृत्ती उघड करते अस म्हणता येईल. त्यातही तुमच्यातील निश्चयाची आणि धैर्याची परीक्षा बघणारी परिस्थिती. सर्व सामान्य माणसाला प्रत्यक्ष होणार मृत्यूच दर्शन कमी होत म्हणून की काय प्रसार माध्यमांनी मृत्यूचा बाजार मांडला. खूप काळ कोंडून घातलेल्या लोकांवर हाही मार चालू राहिला, चालू आहे. पुस्तकं वाचून शब्द कळतात पण अर्थ कळायला ते जरा तरी अनुभवाव लागत हेही कळल आणि मग परत एकदा आपल्याला काय काय कळलय हा प्रश्न पडला.

सरकारी व्यवस्था, रुग्णालये आणि सर्व सामान्य नागरिक पूर्ण थकून गेले आहेत. आता अगदी मृत्यूच्या बातम्यानीही तेवढा धक्का बसत नाही.

आतला स्थितप्रज्ञ म्हणतो की मानवाच्या इतिहासात हे काही पहिल्यांदा होत नाहीये. यातूनही तरुन जाऊ. काळ हा सगळ्यावर उपाय असतो हेही कळत, जाणवत. पण वरचा भावनांचा हिंदोळा काही थांबत नाही. प्रत्येक नव्या मृत्यूगणिक त्या बातमीची तीव्रता कमी होत जाते आणि धक्का बसायच देखील कमी होत.

यातून लवकर बाहेर पडू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करत असलो तरी जेव्हा बाहेर येऊ तेव्हा असंख्य लोक आतून बाहेरून बदललेले असतील. अर्थात हे देखील इतिहासात पहिल्यांदाच होत असेल अस नाहीच.


आपलाही इतिहास

The life and times of Saataarkar – प्रस्तावना 

नावात लिहिल्या प्रमाणे हा सर्व सामान्य माणसांचा इतिहास आहे. सोय उपलब्ध आहे, शक्य आहे म्हणून हा प्रपंच. या मालिकेत चालू घडामोडी माझ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे. हे अनियतकालिक असणार आहे तरी देखील जितक शक्य तितक नियमित करण्याचा देखील प्रयत्न असेल. 

कुठल्या विशिष्ट विषयाला वाहिलेल वगैरे अस काही नसून त्या त्या वेळेला ज्या विषयावर लिहावस वाटेल त्यावर लिहिल जाईल. मुख्य ब्लॉग मालक सोडून आणखीही काहीजण सहभागी होण्याची शक्यता आहे. तस झाल्यास ते ते नाव तेव्हा नोंद केल जाईल. 

थोरा मोठ्यांच्या दृष्टिकोनातून हा काळ कसा होता, कसा नव्हता हे लिहिल जाईलच – पुस्तकातून, वृत्तपत्रांतून आणि इतर तत्सम माध्यमातून तो भावी पिढी समोर येईलही. पण ते प्रामुख्यान मोठ्या मोठ्या विषयांना स्पर्श करणार आणि तज्ञ लोकांच्या लेखणीतून असेल. त्याची परिमाण वेगळी असतील.

ओळख करून द्यायला एवढी प्रस्तावना पुरेशी असावी. बाकी आणखी काही उत्सुकता असेल तर पुढे ती लेखातून शमेलच.

धन्यवाद. 🙏🏼